महाराष्ट्र

अडचणीत सापडलेल्या सहकारी दूध संघांना संरक्षण देण्याचे धोरण शासनाने स्वीकारावे – परजणे

अडचणीत सापडलेल्या सहकारी दूध संघांना
संरक्षण देण्याचे धोरण शासनाने स्वीकारावे – परजणे

गोदावरी दूध संघाच्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगांव :-अडचणीच्या काळात नफा – तोट्याचा विचार न करता शासनापेक्षा अधिकचा दर देऊन दूध उत्पादकांना आधार देणाऱ्या सहकारी दूध संघांच्या पाठिशी उभे राहून संरक्षण देण्याचे धोरण शासनाने स्वीकारावे अशी मागणी गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या या ठरावास सर्व सभासद व दूध उत्पादकांनी सहमती दर्शवली.गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदावरुन राजेश परजणे पाटील यांनी संघाच्या कामकाजाविषयी व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषीयीची माहिती दिली. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.सहकारातील बड्या नेत्यांनी राज्यातले साखर कारखानेच मोठे करण्याचे धोरण राबवून सहकारी दूध संघाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. या सापत्न वागणुकीमुळे आज राज्यातले अनेक दूध संघ अडचणीत आले आहेत. अशाही परिस्थितीत गोदावरी दूध संघाने दूध उत्पादकांचे हीत समोर ठेऊन शासनापेक्षा तीन ते चार रुपये अधिक दर दिला. यातून संघाला कोट्यावधीचा तोटा सहन करावा लागला. अनेक चढ उतार येऊनही संघाने आपली वाटचाल सुरूच ठेवली असल्याचे सांगून श्री परजणे पुढे म्हणाले, गोदावरी दूध संघाने अहवाल सालामध्ये एकूण ५ कोटी ९१ लाख २६ हजार ११८ लिटर्स दुधाचे संकलन केलेले असून वार्षिक उलाढाल २२९ कोटी ६८ लाख ९७ हजार इतकी झालेली आहे. शेतकऱ्यांना दूध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी संघाने अमेरिकेतून आयात केलेल्या अत्याधुनिक सॉर्टेड सिमेनची ऑक्टोंबर २०१६ पासून कार्यक्षेत्रात सुरुवात केली. या सॉर्टेड सिमेनमुळे जन्माला येणाऱ्या कालवडींची संख्या ९२ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. जन्मलेल्या कालवडींपैकी अनेक कालवडी व्यायल्या असून त्यांची दूध देण्याची दैनंदिन क्षमता सुमारे २६ ते २७ लिटर्स इतकी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेल्या गायींसाठी १,०५० रुपये किंमतीचे सॉर्टेड सिमेन सवलतीच्या दराने म्हणजेच १५० ते २०० रुपये प्रमाणे तीन महिन्याकरिता उपलब्ध करुन दिलेले होते. त्यासोबत २४ लाख ०५ हजार ६०० रुपयाचे मिनरल मिक्चर मोफत देण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा दूध उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा उपक्रम राबविताना संघ व बायफ संस्थेने १ कोटी ५७ लाख ८६ हजार ७५० इतका आर्थिक भार सोसलेला आहे. कोपरगांव तालुक्यासह राहाता, वैजापूर, येवला, सिन्नर या तालुक्यातही दूध उत्पादन वाढीसाठी ४० केंद्रांमार्फत कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याकरिता संघ वर्षाकाठी सव्वा कोटीपर्यंत खर्च करीत आहे. संघाच्या कार्यस्थळावरील पशुरोग निदान प्रयोगशाळेत सन २०१८ पासून जनावरांच्या विविध आजारांवर निदान व उपचार सुरु आहेत. बहुतांशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांचेरक्त, मलमूत्राचे १,१८७ नमुने तपासणासाठी दिलेले असून उपचाराचा लाभ घेतलेला आहे. तसेच गोदावरी पशुसंवादिनी या उपक्रमाच्या माध्यमातून ४,६५२ पशुपालकांना गोठ्याची रचना, जनावरांची घ्यावयाची काळजी, जनावरांना दिले जाणारे खाद्य, जंत निमलून, लसीकरण, स्वच्छ दूध उत्पादन याबाबत माहिती देवून मार्गदर्शन केलेले आहे.स्टेट बैंक ऑफ इंडिया व प्रवरा सहकारी बँकेच्या आर्थिक सहकार्याने गांव पातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था व सेंटरच्या दूध उत्पादकांना गायी खरेदी, गोठा दुरुस्ती, कडबाकुट्टी, मिल्कींग मशिन असे साहित्य खरेदी करण्यासाठी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करुन दिलेले आहे. तसेच नव्याने स्टेट बँकेच्या कोपरगांव शाखेकडून संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना गायी खरेदीसाठी अत्यल्प व्याजाने कर्ज पुरवठा केलेला आहे. याशिवाय संघाच्या गोदावरी सहकारी पतसंस्थेमार्फतही गायी खरेदीबरोबरच जनावरांचा गोठा, रबर मॅट, मिल्कींग मशिन अशा साहित्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. संघाने नाशिक येथील जीएचई – ईव्ही लिमिटेड या शेतीपुरक व्यवसायाशी निगडीत असलेल्या कंपनीबरोबर वीस वर्षाचा करार करुन दूध उत्पादकांच्या शेतातील शेतमाल तयार झाल्यानंतर वाया जाणारा पालापाचोळा, भुसा, ऊसाचे पाचट, मक्याचा चारा यापासून बायोमास पॅलेटची निर्मिती करण्यात येणार आहे. या उद्योगातून कार्यक्षेत्रातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मागील दोन तीन वर्षाच्या कालावधीत कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी आर्थिकदृष्ट्या सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता परिस्थिती पूर्वपदार येत असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी व दुग्धव्यवसायात तग धरुन राहण्यासाठी दूध उत्पादकांना काही अनावश्यक गोष्टींना आळा घालून व्यवसाय करावा लागणार असल्याचेही आवाहन श्री परजणे पाटील यांनी केले.सभेला संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव, विवेक परजणे, उत्तमराव माने, निवृत्ती नवले, यशवंतराव गव्हाणे, भिकाजी थोरात, भाऊसाहेब कदम, सदाशिव कार्ले, दिलीप तिरमखे, सुनंदाताई होन, कुंदाताई डांगे यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ कार्यकर्ते आंबादास वराडे यांनी आभार व्यक्त केलेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे