समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आलेले रस्ते तातडीने पूर्ववत करून द्या- आ.आशुतोष काळे
समृद्धी महामार्गामुळे बाधित रस्त्यांची पाहणी करून दुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांना सूचना करतांना आ.आशुतोष काळे.
समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आलेले रस्ते तातडीने पूर्ववत करून द्या- आ.आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होवून हा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या समृद्धी महामार्गासाठी पूर्व भागातील अनेक गावातील ज्या रस्त्यांचा वापर करण्यात आला त्यापैकी खराब झालेले काही रस्ते अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व रस्त्यांची पाहणी करून आ. आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे प्रमुख अधिकारी, समृद्धी महामार्ग ठेकेदार व कार्यकर्त्यां समवेत रस्त्यांबाबत सर्वच गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी उपस्थित अधिकारी व समृद्धीच्या ठेकेदारांना उर्वरित सर्व रस्ते तातडीने पूर्ववत करून देण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.आठ महिन्यापूर्वी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होवून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. मात्र हा समृद्धी महामार्ग तयार करतांना वाहतुकीसाठी महामार्गा लगत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली होती. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु पूर्व भागातील काही रस्त्यांची अजूनही दुरुस्ती झालेली नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याबाबत पूर्व भागातील अनेक नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत संवत्सर, कोकमठाण, धोत्रे, भोजडे, खोपडी,लौकी आदी गावातील रस्त्यांची समक्ष पाहणी करून नागरिकांना येत असलेल्या अडचणी लक्षात आणून देत या अडचणी तातडीने सोडवून हे सर्व रस्ते पूर्ववत करून देण्याच्या सूचना केल्या.तसेच समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांना ज्या ठिकाणी पार करून जात आहे त्या ठिकाणी अनेक लहान-मोठ्या पुलांची निर्मिती झाली आहे. त्या ठिकाणी जुना रस्ता व पुलांची उंची यामध्ये तफावत असल्यामुळे पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने कोणत्याही अडचणी येणार नाही त्यासाठी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र चर खोदावे. व्यक्तिगत अडचणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाईप लाईन, सर्व्हिस रोड व खोदकाम केलेली शेती याबाबतच्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी डक्ट तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करा. पावसाळ्याचा विचार करून डक्ट, लहान-मोठे पूल व पर्यायी रस्त्यावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय योजना करा व नागरिकांनी ज्या अडचणी मांडल्या त्या अडचणी लवकरात लवकर दूर करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक शिवाजी शेळके, माजी संचालक सुदाम लोंढे, गौतम बँकेचे संचालक विजयराव रक्ताटे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक व्यंकटेश बारहाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब बारहाते, भोजडेचे सरपंच सुधाकर वादे, कोकमठाणचे उपसरपंच अरविंद रक्ताटे,एम.एस.आर.डी.सी.चे विश्वनाथ सातपुते, सचिन भोईटे, राज कन्स्ट्रक्शन्सचे अभियंता सुमेध वैद्य आदींसह संवत्सर, कोकमठाण, धोत्रे, भोजडे, खोपडी,लौकी आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




