धार्मिक

आषाढी कार्तिकी विसरू नका मज।

आषाढी कार्तिकी विसरू नका मज।

आषाढी, कार्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गुज पांडुरंगा।।
प्रबोधनी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रस्तुत निरुपणासाठी घेतलेला हा अभंग आहे, पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहे. संत हैबतबाबा यांनी वारीला सांघिक रूप दिले. तेथून वारी शेकडो वर्षापासून चालत आली आहे. आषाढी कार्तिकी वारी सर्वात महत्त्वाची वारी आहे. वारीमध्ये स्त्री-पुरुष, गरीब श्रीमंत, उच्च -नीच यांच्या पलीकडची भेद रहित वारी आहे .ही वारी समतेची शिकवण देते *या रे या रे लहान थोर। याती भलते नारी नर* असे म्हणून आपण सर्वजण एक आहोत. याचीही शिकवण देते.
आषाढी कार्तिकीला मला विसरू नका. तुमचं काय ते माझ्याजवळ मत मांडा .असे हे अभंगातून आपल्या सुचवायचे आहे ,कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी म्हणतात, भगवान विष्णू देवशयनी आषाढी एकादशीला निद्रा घेतात व प्रबोधनी एकादशीला ते जागे होतात, अशी वारकरी संप्रदायाची कल्पना आहे.
तसेच अध्यात्मात वारकऱ्यांचा आषाढी व कार्तिक एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैष्णव व भागवत सांप्रदायाच्या दोन एकादशीला जास्तीत जास्त भाविक उपवास करतात व पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतात. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते, चातुर्मास आषाढ पासून सुरू होतो व कार्तिकी एकादशी नंतर पौर्णिमेला संपतो या एकादशीला देवोत्थनी, देवठी, प्रबोधनी अशा नावाने ओळखले जाते. कार्तिकी एकादशी म्हणजे श्रीविष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत होय, ईश्वराविषयी असलेले अज्ञान यांचे धोतक आहे एकादशीच्या दिवशी सर्व प्राणी मात्राचे सात्विकता, वाढत असल्याने या दिवशी व्रत करतात .

जाहिरात

;पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोजता येणार नाही. एवढी आहे.दरवर्षी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या दिवशी पती-पत्नी विठ्ठलाच्या पादुकांची पूजा करतात. तर कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पांडुरंगाची मनोभावे पूजा करून मागणं मागितले जाते .
अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.
*व्रत एकादशी करीन उपवासी।
गाईन अहनिर्शी मुखी नाम विठोबाचे*
असे भक्तमंडळी म्हणतात, दरवर्षी पंधरवडा एकादशीला काही भाविक भक्त पंढरपूरला जातात परंतु आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सर्वात जास्त भाविक पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जातात. भौगोलिक कारण पाहता दक्षिणायन ही देवाची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस समजला जातो ,
तुळशी विवाह कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत लावले जातात. तुळशी विवाह लावल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते हे पद्मपुराणात लिहिले आहे तुळस श्रीविष्णूला अतिशय प्रिय आहे. समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यातून तुळशीचा जन्म झाला ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे. वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ तुळशीच्या खोडापासून बनविली जाते. तुळस वनस्पती पासून ऑक्सिजन मिळतो, अंगणात तुळस असल्याने मन प्रसन्न होते त्यामुळे कार्तिकी द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो ,त्यानंतरच सर्व रूढी परंपरेनुसार केले जाणारे मनुष्याचे विवाह शुभ मानले जातात ,वारकरी संप्रदायांमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र एकादशी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात .
अशा आषाढी ते कार्तिकीच्या चातुर्मासात अनेक भक्त, संत ,महंत वारकरी पंढरपुरात मुक्कामी असतात. चातुर्मासाची समाप्ती कार्तिकी पौर्णिमेला पूर्ण होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन तृप्त होते. विठ्ठलाच्या नामाच्या गजराने अवघे पंढरी दुमदुमून जाते. चंद्रभागा नदीमध्ये वारकरी स्नान करून आणि चंद्रभागेच्या वाळवंटात भजन गाऊन पांडुरंगाचे मनोमन पूजन करतात. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचि दान। पंढरीचा वारकरी वारी चुकून नेदी हरी। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।असे वारकरी आनंदाने भजन गातात.
माणसांमध्ये भेदाभेद करणे हा अधर्म आहे *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ* तुम्ही कोणालाही तुच्छ लेखू नका या पृथ्वीवर असणारे सर्व मानव समान आहेत पंढरीच्या पांडुरंगाने सर्व जाती-धर्माच्या संतांना जवळ घेतले आहे संत चोखामेळा, संत सेना न्हावी, संत गोरोबा कुंभार ,संत सावतामाळी, संत नरहरी सोनार ,संत रोहिदास, संत जनाबाई ,संत नामदेव. संत कान्होपात्रा या सर्वांना घेऊन त्यांनी भक्तीचा मळा फुलविला *विठु माझा लेकुरवाळा। संगे गोपाळाचा मेळा* असे म्हटले जाते .एकंदरीत कार्तिकी वारीला भक्त पंढरपुरात येतात तहानभूक विसरतात तसेच कार्तिकीला सुद्धा अनेक जण वारी करतात ,पंढरीची वारी म्हणजे एकात्मतेचे प्रतिक आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरीचा राजा पांडुरंग होय. कोणतेही निमंत्रण नसताना लाखोच्या संख्येने एकत्रित येऊन हरिनामाच्या गजरात तल्लीन होतात.
दैदिप्यमान सोहळ्यातील सात्विकता भक्ती, निःस्पृहचा ,त्याग यामुळे वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा आहे. म्हणूनच आषाढी कार्तिकी विसरू नका मज। सांगतसे गुज पांडुरंगा।।
असे म्हटले जाते. पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहे. आणि ते चालणारच आहे. वारी ही समानता शिकविते, सर्वांना एकत्रित आणते, त्यामुळे सर्वांचा सीन भाग दूर जातो. म्हणून संत महंत ,वारकरी, भजन करी टाळकरी, मृदुंगाचार्य, विणेकरी एका सुरात म्हणतात. *भाग गेला शिन गेला। अवघा झाला आनंद*।।हे पंढरीच्या पांडुरंगा तुला पाहिल्यानंतर आमच्या मनातील वाईट कल्पना निघून जातात. तुझे चांगले विचार आमच्या मनात येतात. आम्ही केलेल्या कामाचा कष्टाचा परोपकाराचा सगळा सीन भाग निघून जातो आणि एक प्रकारचा मनाला आनंद होतो. असे वारकरी या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपापसात चर्चा करतात, म्हणून वारी करा व आनंद मिळवा. पंढरीची वारी ही सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. कार्तिकी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

जय जय राम कृष्ण हरी
शब्दांकन
: *प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मखेड जि .नांदेड

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे