मलिदा खाणाऱ्या बोक्यांना कोपरगावकरांप्रती खोटा कळवळा – सुनील गंगुले
मलिदा खाणाऱ्या बोक्यांना कोपरगावकरांप्रती खोटा कळवळा – सुनील गंगुले
कोपरगाव प्रतिनिधी :- कायद्यात तरतूद असल्याप्रमाणे ४०% करवाढ करण्याबाबत कुणीही सहमती दिली नाही देणार पण नाही. त्यामुळे कमीत कमी किती कर आकारला जावू शकतो याबाबत प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्याकडे आ. आशुतोष काळे यांचे बारीक लक्ष आहे. शहराची तहान भागविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे आ. आशुतोष काळे कोपरगावकरांवर कधीहि अन्याय होवू देणार नाही याचा शहरवासीयांना विश्वास आहे. मात्र ज्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत ते नागरिकांची दिशाभूल करीत आहे. ज्यांनी पाच वर्ष सत्ता भोगली, सत्तेत राहून मलिदा खाल्ला. त्या मलिदा खाणाऱ्या बोक्यांना कोपरगावकरांप्रती खोटा कळवळा असल्याची टीका विवेक कोल्हे यांनी केलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात ११०० कोटीचा आणलेला निधी व त्या निधीतून झालेला विकास मतदार संघातील जनतेला दिसत आहे. मात्र ज्यांच्या डोळयावर राजकारणाची पट्टी आहे त्यांना हा विकास कधीच दिसणार नाही. मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांचे सरकार असतांना जो विकास झाला नाही तो विकास आ. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात करून दाखविला आहे. मतदार संघाचा विकास साधताना त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा महत्वाचा असतो. नुसते नेत्या समवेत फोटो काढून निधी मिळत नाही आणि विकासही होत नाही. – सुनील गंगुले.
सुनील गंगुले यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील पाच वर्ष कोपरगाव नगरपरिषदेत सगळ्यात जास्त २२ नगरसेवक त्यांचे, बहुमत त्यांच्याकडे, त्यांना जनतेची एवढी कळकळ होती तर मागील पाच वर्ष हे सत्तेवर असतांना त्यावेळी त्यांना वाढीव घरपट्टी बाबत समजले नाही का? त्यावेळी हा विषय चर्चेला का घेतला नाही? का त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले हे देखील त्यांनी स्पष्ट करावे. मात्र याचे विरोधकांकडे व त्यांच्या नेत्याकडे देखील उत्तर नाही. त्यामुळे ते करवाढीचे आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारू पाहत आहे. तुमच्या बहुमतामुळे तुम्ही कोपरगाव शहराचा विकास तर रखडवलाच त्याच बरोबर अवास्तव करवाढी बाबत योग्य भूमिका न घेतल्यामुळे कोपरगावकरांवर अवास्तव करवाढीच संकट आणून ठेवल. मात्र हे संकट आ. आशुतोष काळे येवू देणार नाहीत. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम याबाबत बैठका घेवून नागरिकांच्या समक्ष कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला सूचना देवून त्यातील कायदेशीर बाबी तपासून त्यांचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे. त्याबाबत सर्वच घटकातील नागरिक समाधानी आहेत. मात्र चोर तर चोर वरून शिरजोर अशी भूमिका घेणाऱ्या विरोधकांनी आंदोलनाची नौटंकी करून जनतेची दिशाभूल केली आहे.
माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या घरात मागील वीस वर्षापासून कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता आहे. त्यांना आपल्या प्रभागातील गटारी करता आल्या नाही. ते विकासाची भाषा शिकवतात त्यांची लोक्प्र्तीनिधीवर टीका करायची लायकी आहे का? -सुनील गंगुले.
मागील पाच वर्ष यांच्याकडे २२ नगरसेवकांचे बहुमत. त्यावेळी हेच बोके नगरसेवक, गटनेते व उपनगराध्यक्ष देखील होते. त्यावेळी या बोक्यांनी नागरिकांनी विकासासाठी दिलेल्या करात मलिदा खाल्ला आहे. सत्ता असतांना विकासाला विरोध आणि आता सत्ता येणार नाही म्हणून जनतेची दिशाभूल. त्यामुळे यांना जनतेशी काही देन घेण नाही. करवाढ कमी करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्र व्यवहार केला आहे. अनेक बैठका घेवून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत व प्रशासनाने देखील योग्य भूमिका घेतली आहे. मात्र मलिदा खाणारे करवाढीचा प्रचार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारची करवाढ कदापि होणार नाही. आकारण्यात येणारी करवाढ नियमाप्रमाणेच आकारली जाईल मात्र त्याबाबत सविस्तर माहिती आजमितीला कुणाकडे नाही. करवाढ करण्याबाबत झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने मान्य केले असून चुकीची करवाढ कमी होणार आहे मात्र वावड्या सोडून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचे सुनील गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे.
जेष्ठ नेत्यांना आंदोलनाची माहिती दिली नव्हती का?—-
-एकीकडे करवाढीला स्थगिती मिळाल्याचे प्रसिद्धी पत्रकात सांगायचे. फ्लेक्स बोर्ड लावून दिंडोरा पिटायचा. तर दुसरीकडे त्यांचे ज्येष्ठ नेते म्हणतात की, १० % करवाढ झाली पाहिजे. तुम्ही करवाढ मागे घेण्याबाबत आंदोलन करीत होता याची माहिती ज्येष्ठ नेत्यांना दिली नव्हती का? एकीकडे स्थगिती मिळाल्याचे पेढे वाटता व दुसरीकडे १० % करवाढीची मागणी करता हि जनतेची दिशाभूल नाही का?- सुनील गंगुले.


