झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याचा प्रस्ताव मंजुर होण्यासाठी पाठपुरावा करावा; आ. आशुतोष काळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याचा प्रस्ताव मंजुर होण्यासाठी पाठपुरावा करावा; आ. आशुतोष काळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोपरगाव प्रतिनिधी – ग्रामीण भागातील दळणवळणाचा दर्जा सुधारणे आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे हीच शाश्वत विकासाची खरी गुरुकिल्ली असल्याने तालुक्यातील अनेक प्रलंबित कामांचे प्रस्ताव शासन दरबारी सादर केले आहे. यातील अतिशय महत्वाचा झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्ताच्या प्रस्ताव विविध योजनेंतर्गत दाखल केला असून हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शुक्रवार (दि.१२) रोजी कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावात भेट दिली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी त्यांची भेट घेतली असता झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्ता (राज्य मार्ग क्रमांक ६५) रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे असल्याने या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव सीआरएफ, हॅम, एडीबी, एनडीपी, एआयबी कडे दिला असल्याबरोबरच केंद्रीय रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेण्याची मागणी केली आहे. आपण देखील या रस्त्याच्या कामासाठी विविध स्तरावर प्रयत्न करावे. तसेच अंजनापूर बंधारा क्रमांक ३ ते मंगलमूर्ती मंगल कार्यालय पर्यंत तसेच निळवंडे तळेगाव शाखा कालवा टेल ते खोकड विहीर पूर चारी अशा महत्वाच्या कामांचे प्रस्तावांवर शासनाकडे दाखल असून हे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आपण देखील पाठपुरावा करावा. मी सातत्याने हे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करीत असून या रस्त्याच्या खराब रस्त्याच्या लांबी करिता बजेट मधून जास्तीतजास्त निधी उपलब्ध होऊन रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती यावेळी आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे अत्यंत गरजेचे असून या कामाचा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. हि मंजुरी लवकरात लवकर मिळावी. हे दोन्ही प्रस्ताव संपूर्ण परिसराच्या आर्थिक आणि शेतीविषयक प्रगतीला दिशा देणारे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील या प्रस्तावांना गती देणे अत्यंत गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी जिल्ह्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशाकीय पातळीवर प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार सौ. प्रफुल्लिता सातपुते, कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी सुहास जगताप, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सरपंच सौ. कविता गव्हाणे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



