शिर्डी विमानतळाने ओलांडला ११ लाख ५८ हजार प्रवाश्यांचा टप्पा
शिर्डी विमानतळाने ओलांडला ११ लाख ५८ हजार प्रवाश्यांचा टप्पा
१ लाख ७० हजार किलो शेतमालाची कार्गोने ने-आण
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक दीपक कपूर यांचा मुख्यमंत्र्याकडून सन्मान
शिर्डी, दि. १२ मे (उमाका वृत्तसेवा) -शिर्डी विमानतळाने ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. तसेच आतापर्यंत शिर्डीवरून कार्गोने १ लाख ७० हजार किलोपर्यंतचा शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला आहे.शिर्डी विमानतळाच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आऊटलुक फॉर एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत भारत सरकार कडून हैद्राबाद येथे पुरस्कार देण्यात आला आहे. विमानतळ विकास कंपनीच्या या कामगिरीबद्दल व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते मुंबई येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.शिर्डी विमानतळाने ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला. ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. तसेच शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बेंगलोर, चेन्नई व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत शिर्डीवरून कार्गोने १ लाख ७० हजार किलोपर्यंत शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला ही कौतुकाची बाब आहे. असे गौरवोद्वार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रसंगी काढले.शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेने ३ जानेवारी २०२२ रोजी १० लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला होता. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिर्डी हे चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ आहे. शिर्डी विमानतळावरून स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन्स ची सेवा दिल्ली, हैद्राबाद, अहमदाबाद आणि चेन्नई या ठिकाणांसाठी सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या विमानतळाला ‘ग्रीन फिल्ड’चा दर्जाही देण्यात आला आहे.



