वारीत मोफत तणनाशक फवारणीच्या पाच दिवसीय मोहिमेची सांगता !
श्रमदानातून मोफत तणनाशक फवारणीच्या पाच दिवसीय मोहिमेच्या सांगतेप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हातवर करून आनंद व्यक्त करताना स्वच्छताप्रेमी
वारीत मोफत तणनाशक फवारणीच्या पाच दिवसीय मोहिमेची सांगता !
सामाजिक दायित्व : स्वच्छता प्रेमींचा श्रमदानातून प्रेरणादायी उपक्रम
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालय, जय बाबाजी भक्त परिवार व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता अभियान सुरु आहे. या अभियानाच्या अठराव्या आठवड्यानिमित्त वारीतील सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून पाठीवरील फवारणी पंपाच्या साह्याने रविवारी (दि.१७) गावातील श्री रामेश्वर विद्यालयापासून सुरु झालेल्या या पाच दिवसीय विशेष मोहिमेची शुक्रवारी (दि.२२) सकाळी ९ वाजता साकरवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व स्मारक परिसरात सांगता करण्यात आली.वारीत गेल्या अठरा आठवड्यापासून वारी गावासह परिसरातील सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक सोमवारी सकाळी ६ ते ९ यावेळेत श्रमदानातून स्वच्छता करण्याचे अभियान सुरु आहे. अशातच सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र गवताचे प्रमाण वाढले आहे. हेच गवत मोठे झाल्यानंतर त्यात डासांचा निवारा होतो. त्यातून विविध आजार वाढतात. यातून गावाचे स्वास्थ्य बिघडते तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील भीती वाढते. त्यामुळे तणनाशक फवारणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत स्वच्छताप्रेमींनी स्वतः पाठीवर फवारणी पंप घेऊन फवारणी केली. तर इतर सहकाऱ्यांनी फवारणीसाठी लागणारे पाणी बकेटद्वारे उपलब्ध करून दिले.या पाच दिवसीय अभियानात गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस दूरक्षेत्र, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालय, पोष्ट कार्यालय, सर्व मंदिर, मज्जीद, चर्च, समाज मंदिर, बुद्धविहार, व्यायामशाळा, बाजारतळ, सार्वजनिक शौचालय, पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या, स्मशानभूमी, विविध सार्वजनिक ठिकाण, सर्व चौक, प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, खेळांचे मैदान तसेच गावाबाहेरील परिसर अशा जवळपास १५० सार्वजनिक ठिकाणी १०० पेक्षाजास्त पाठीवरील पंपाच्या साह्याने तणनाशक फवारणी करण्यात आली. या अभियानात तणनाशक हे ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिले. या अभियानाच्या माध्यमातून गावाचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या अभियानात सरपंच सतीश कानडे, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, सामाजिक कार्यकर्ते मधुकर टेके, वारी सेतू कार्यालयाचे संचालक रवींद्र टेके, सेवानिवृत्त अधिकारी रावसाहेब जगताप, पत्रकार रोहित टेके, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, संदीप आगे, मनोज जगधने यांनी आपले श्रमरुपी योगदान दिले.



