निर्भीड आणि दिलदार असा कामाचा दादा माणूस हरपला : बिपीनदादा कोल्हे
निर्भीड आणि दिलदार असा कामाचा दादा माणूस हरपला : बिपीनदादा कोल्हे
महाराष्ट्र राज्याचे उद्योनमुख राजकारणी, निर्भीड व्यक्तीमत्व आणि रूबाबदार शैली असे त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व अजितदादा पवार यांच्या दुर्देवी निधनाने आपण एका सडेतोड, हजरजबाबी उपमुख्यमंत्र्याला गमावले अशी प्रतिकिया संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली. त्यांच्या नावातही दादा होते आणि कामातही ते दादा होते असेही ते म्हणाले. संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनीही त्यांच्या दुर्दैवी निधनाबददल शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, अजितदादा पवार यांचे आजोळ अहिल्यानगर जिल्हयातील देवळाली प्रवरा येथील होते. दहावीपर्यंत येथेच त्यांचे शिक्षण झाले. दिलखुलास व्यक्तीमत्व, जे काही आहे ते आडपडदा न ठेवता स्पष्टपणे सांगणे, आणि जे काम होणारे असेल ते लगेच हातावेगळे करणे या राजकीय हातोटीला आपण कायमचे मुकलो आहे. राज्याच्या राजकारणांत त्यांचा वेगळाच दबदबा होता.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर काम करतांना राज्यासह देशातील साखर कारखानदारीच्या प्रश्नांचा अभ्यास करून ते हाताळायला मिळाले अशी स्पष्ट कबुली त्यांनी अलिकडेच देशातील पहिल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्प उदघाटनप्रसंगी ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी संजीवनी कार्यस्थळावर दिली होती. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये त्यांनी आठव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्यातील अनेक विकासाच्या प्रकल्पांना गती देत वेगवान प्रशासनाची चुणूक दाखविली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती आदि शहरांचा विकास झाला. तत्कालीन जलसंपदा मंत्री म्हणूनही त्यांनी उर्ध्व गोदावरी खो-यातील धरणे, गोदावरी कालवे, निळवंडे धरण यासह अनेक सिंचन प्रश्नांना चालना देत ती पुर्णत्वास आणली. त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन आदि संस्थांमध्ये काम करायला मिळाले.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मतदार संघातील पश्चिमेच्या जिरायत भागातील शेतक-यांना वरदान ठरणा-या उजनी उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लागावे म्हणून तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मोठा पाठपुरावा केला होता त्या प्रश्नांत त्यांनी स्वतः लक्ष घालुन पुर्णक्षमतेने अर्थमंत्री म्हणूनही निधी उपलब्ध करून देत त्यातुन पाझर तलाव भरण्याची योजना साकारली होती. त्यांच्या अकाली जाण्यांने पवार कुटूंबियांवर जो आघात झाला त्या दुःखात संपुर्ण कोल्हे परिवार सहभागी आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी तयार झाली आहे ती कशानेही भरून येणार नाही. १९८२ पासुन अजितदादा पवार राजकारणांत सक्रीय झाले तेंव्हापासुन ते ४४ वर्षापर्यंतचा झंजावात आता निशब्द झाला असेही बिपीनदादा कोल्हे म्हणाले.



