महाराष्ट्र

गोदावरी कालवे दुरूस्तीसाठी ना.आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत आहे – ना. जयंतराव पाटील

गोदावरी कालवे दुरूस्तीसाठी ना.आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत आहे – ना. जयंतराव पाटील

कोपरगाव प्रतिनिधी  :- सर्व आमदारांनी अधिवेशनात जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडले आहेत. त्याप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा देखील प्रश्न चर्चिला गेला आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे निवडून आल्यापासून गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी अधिवेशन सुरु असतांना सभागृहात आवर्जून सांगत जलसंपदा विभागाने डावा तट कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली असल्याचे सांगितले आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांचे आयुर्मान ११५ वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे हे कालवे वारंवार फुटणे त्यामुळे पाण्याचा अपव्यय होवून त्याचा परिणाम आवर्तनावर होत असल्यामुळे गोदावरी कालव्यांची तातडीने दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे होते. त्यापैकी ९० किलोमीटरपर्यत वाहत जाणाऱ्या गोदावरी डावा तट कालव्याची तर अवस्था अत्यंत वाईट झाली होती.३७९ क्युसेक्सने वाहण्याची क्षमता असणाऱ्या डाव्या तट कालव्याला १५० क्युसेक्स पाणी जास्त होत असल्यामुळे मागील पाच वर्षात अनेकवेळा कालवा  ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याबाबत जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी अधिवेशनात ना. आशुतोष काळेंचा स्पष्टपणे उल्लेख करून अन्न पुरवठा मंत्री ना. छगनरावजी भुजबळ हे देखील आग्रही असल्याचे सभागृहात सांगितले.त्यामुळे जलसंपदा विभागाने गांभीर्याने दखल घेवून डाव्या तट कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून डाव्या तट कालव्यावरील ३६४ स्ट्रक्चर्स पैकी १२१ बांधकामे विशेष दुरुस्ती अंतर्गत पूर्ण केली आहेत. २२ कामांना ७५.८७ कोटी निधीच्या कामांना २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यता देवून कामे सुरु करण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात ३३ कोटी निधीची तरतूद करून या कामांच्या देखील निविदा प्रक्रिया प्रगतीत आहे. गोदावरी डावा तट कालवा सर्वात जुना कालवा असून या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. त्यामुळे ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून डाव्या तट कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गोदावरी डावा तट कालवा सुधारून होत असलेली पाण्याची गळती कायमस्वरूपी थांबविण्यासाठी जलसंपदा विभाग वेगाने प्रयत्न करीत असून पुढील दोन वर्षापर्यंत डाव्या तट कालव्याचे दुरुस्तीचे बहुतांश प्रश्न कमी होणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे डाव्या तट कालव्यावर सिंचनासाठी अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टर क्षेत्राची कालवा दुरुस्तीची अत्यंत महत्वाची समस्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यात ना. आशुतोष काळे यांना यश मिळाले आहे. डाव्या तट कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देणाऱ्या जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, त्याबाबत पाठपुरावा करणाऱ्या ना. आशुतोष काळे यांचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहे

जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे