धार्मिक

पुणतांबा येथील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या विकासासाठी निधी द्या;

पुणतांबा येथील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या विकासासाठी निधी द्या;

आमदार आशुतोष काळे यांची पालकमंत्री ना. विखे पाटील यांच्याकडे मागणी

कोपरगाव वार्ताहर-धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि दक्षिण काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथील गोदावरी नदीकाठावरील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी तातडीने निधी देण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी निवेदनात पुढे असे नमूद केले आहे कि, पुणतांबा हे तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असून गोदावरी नदीकाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला अहिल्या घाट हा या परिसराच्या वैभवाचा आणि अस्मितेचा ऐतिहासिक ठेवा आहे. हा घाट प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जात असून या घाटावर २६ भव्य दगडी पायऱ्या, आकर्षक गोलाकार बुरूज, प्राचीन महादेव मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर आणि संत चांगदेव महाराज समाधी परिसर यांसारखी महत्त्वाची धार्मिक व पवित्र स्थळे आहेत. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशामुळे तसेच वर्षभरात अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्याने  राज्यभरातून हजारो भाविक, अभ्यासक आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत असतात.

परंतु, काळाच्या ओघात आणि योग्य देखभालीअभावी सध्या या ऐतिहासिक घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटाचे जुने दगडी बांधकाम आता झिजत चालले असून अनेक ठिकाणी भिंतींना व पायऱ्यांना मोठे तडे गेले आहेत. घाटावर येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या संरक्षण भिंत आणि कठड्यांचा येथे मोठा अभाव जाणवतो आहे. याशिवाय घाटाच्या परिसरात स्वच्छता, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, ऐतिहासिक माहिती देणारे फलक आणि एकूणच सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीशी आणि लोककल्याणाच्या कार्याशी निगडित असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे मूळ वैभव टिकवणे आणि तिचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.गोदावरी नदी काठावरील या ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर घाटाचा कायापालट करण्यासाठी, इतिहास संवर्धनासाठी आणि भाविकांसह पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असून त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे