‘युद्धशास्त्राचे प्रतीक म्हणजेच अंकाई-टंकाई होय’- राजेंद्र झावरे

‘युद्धशास्त्राचे प्रतीक म्हणजेच अंकाई-टंकाई होय’- राजेंद्र झावरे
संपादक :- रविंद्र जगताप
तपस्वी अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ला श्रावणमासानिमित्त यंदाही भाविक भक्तांसह पर्यटकांच्या गर्दीने गजबजला होता. महाराष्ट्राला अभेद्य अशा गडकिल्ल्यांचा वारसा लाभला असून नाशिक जिल्ह्यातही अनेक गडकिल्ले इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभे आहेत. यापैकी एक म्हणजे येवला तालुक्यातील मुघलशाही, निजामशाही आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला आणि मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास उघड्या डोळ्याने पाहणारा ,अनेक लढायांचे वार अंगावर झेलणारा आणि अकराव्या बाराव्या शतकातील पौराणिक इतिहास असलेला भक्कम दुर्ग म्हणजे अंकाई-टंकाई होय. एखाद्या गावाला इतकं काही ऐतिहासिक वैभव लाभलेलं असतं की, आपणही त्या गावचेचं होऊन जावं असं वाटायला लागतं. यादवांच्या काळात बांधला गेलेला अनकाई-टनकाई किल्ला व जैन लेणींच्या पायथ्याचे अनकाई गाव हे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. कोपरगाव पासून ३६ कि.मी अंतरावर अंकाई किल्ला आहे. कोपरगावकारांना अंकाईचे विशेष आकर्षण असल्यामुळे दरवर्षी श्रावणात कोपरगावातील बरेच नागरिक किल्ल्यावर जाण्यासाठी उत्सुक असतात. दुर्गप्रेमी म्हणून कोपरगावात ओळख असलेले मृत्युंजय तरुण मंडळचे सर्व सदस्यांनी काल चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख मा.नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व किरण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकाई किल्ल्यावर आलेल्या सर्व नागरिकांना राजगिरा लाडूचे वाटप केले व अगस्ती ऋषींच्या आश्रमात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. अधूनमधून बरसणाऱ्या रिमझिम सरी अंगावर घेत, किल्ल्यावर जाणारी अवघड वाट सर करीत अंकाई किल्ला सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.एकामागोमाग येणारी घुमावदार वळणे अन् नागमोडी रस्ते, हिरवेगार डोंगर त्यावर पसरलेली धुक्याची चादर, डोंगरावरून अविश्रांत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि इथले आल्हाददायक वातावरण म्हणजे स्वर्गसुखच असे मत राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केले आहे.या वेळी सुनील भगत,सुप्रसिद्ध इंजिनीअर शेखर भोंगळे,मधुकर साखरे,दिलीप सांगळे, सतीश दीक्षित, मल्हारी देशमुख प्रा.वाकचौरे सर, दिलीप अरगडे,अरविंद सावजी तुकाराम नरोडे आदी उपस्थित होते.



