ब्रेकिंग

हक्काच्या पाण्यासाठी बिपीनदादा कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी फुंकले रणशिंग; जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करणार 

हक्काच्या पाण्यासाठी बिपीनदादा कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी फुंकले रणशिंग; जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करणार 
-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव : समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेंगिरी समितीच्या अन्यायकारक अहवालामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाले आहे. यंदा नगर-नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना या दोन्ही जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडल्यास या भागातील शेती व कारखानदारी उद्धवस्त होईल. जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे. हक्काचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी जाहीर करून पाण्यासाठीच्या लढ्याचे रणशिंग फुंकले.
जाहिरात
हक्काच्या पाण्यासाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या उपोषणात शेतकरी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणांसह सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या ६१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी (१ नोव्हेंबर) संचालक निवृत्ती कारभारी बनकर व त्यांची पत्नी मंदाताई बनकर यांच्या हस्ते, बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी बिपीनदादा कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी कारखान्याने गेल्या ६१ वर्षांत केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला. सूत्रसंचालन संचालक विश्वासराव महाले यांनी केले, तर उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव टी. आर. कानवडे व संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात नगर जिल्ह्यात उसाला उच्चांकी दर देईल, असे सांगून विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने गेल्या ६१ वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले असून, कारखान्याचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली व त्यांच्या आशीर्वादाने अनेक संकटांवर मात केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासत कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. स्व. कोल्हेसाहेबांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात १९९० च्या दशकात देशात सर्वप्रथम उसाच्या रसापासून इथेनॉल व इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प सुरू केले. मध्यंतरी बंद पडलेले सर्व रासायनिक व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत असून, या हंगामात फूड ग्रेड अॅसिटिक अॅसिड निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच स्पेंट वॉशपासून दाणेदार पोटॅशयुक्त खत निर्मिती, बायोगॅस व सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ७ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून, दुष्काळामुळे उसाची कमतरता जाणवत आहे. पुढील वर्षी तर पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडल्यास फक्त ९ ते १० टीएमसी पाणी शिल्लक राहणार असून, त्यातून गोदावरी कालव्यांना किती आवर्तने मिळणार हे जलसंपदा खात्याने जाहीर करावे. कोपरगावसह नगर, नाशिक जिल्ह्यावर पाण्याबाबत होणारा अन्याय शासनाने त्वरित दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
जाहिरात
यावेळी बिपीनदादा कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी नगर, नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाणीटंचाई, कोपरगावच्या हक्काच्या पाण्यासाठी व ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी वाढविण्यासाठी कश्यपी, भाम, भावली, वाकी, गौतमी, मुकणे धरण व गोदावरी नदीवर २०० कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे कुटुंबीयांनी केलेले प्रयत्न याबाबत सविस्तर विवेचन करून ते म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी पाणी, शेती व सहकारी संस्था व मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी व आपण स्वत: शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाण्यासाठी अनेक आंदोलने केली. याउलट माजी खासदार स्व. शंकरराव काळे, माजी आमदार अशोकराव काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे पाणीप्रश्न सोडविण्यात काय योगदान आहे? समन्यायी पाणी वाटप कायदा विधिमंडळात मंजूर होत असताना तत्कालीन आमदार अशोकराव काळे काय करत होते? नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाण्यासाठीचा प्रादेशिक वाद कायमस्वरूपी मिटविण्यासाठी स्व. कोल्हेसाहेबांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावास सन २००० मध्ये विधिमंडळात मान्यता घेतली. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी काहीच केले नाही. २००५ चा समन्यायी पाणी वाटप कायदा हा नगर, नाशिक जिल्ह्यांसाठी अन्यायकारक असून, या काळ्या कायद्याच्या व मेंढेंगिरी समितीच्या जाचक शिफारशीमुळे नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाले आहे. यंदा या दोन्ही जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना जायकवाडीत पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी? सिलिंग अॅक्टमुळे गोदावरी काळव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, हक्काचे पाणीही गेले. आम्ही किती अन्याय सहन करायचा? सरकारने ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील शेतकरी व जनतेचे हक्काचे पाणी हिरावून न घेता जायकवाडी धरणाचा साडेअकरा टीएमसी मृत पाणीसाठा गृहित धरून वरच्या धरणांतून जायकवाडीत पाणी सोडावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे असून, पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प त्वरित पूर्ण होण्यासाठी नगर, नाशिकसह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.यावेळी ज्येष्ठ नेते दत्तात्रयनाना कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कारखान्याचे संचालक रमेश घोडेराव, बाळासाहेब वक्ते, त्र्यंबकराव सरोदे, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, नीलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र कोळपे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, माजी उपाध्यक्ष अरुणदादा येवले, साहेबराव कदम, शिवाजीराव कदम, संजय होन, साईनाथ रोहमारे, मधुकर वक्ते, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, संचालक बाबासाहेब डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, गंगाधरराव चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते रविकाका बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी सभापती सुनील देवकर, शिवाजीराव वक्ते, सीताराम गाडेकर, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाळासाहेब मांजरे, मच्छिंद्र केकाण, उत्तमराव चरमळ, सोपानराव पानगव्हाणे, प्रदीप नवले, रिपाइंचे सचिव दीपक गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, राजेंद्र सोनवणे, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, संजय जगदाळे, अशोकराव लकारे, वैभव गिरमे, गोपीनाथ गायकवाड, दादासाहेब नाईकवाडे, नसीरभाई सय्यद, चंद्रकांत वाघमारे, खालिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, सरपंच डॉ. विजय काळे, रवींद्र आगवन, यादवराव संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, दीपक चौधरी, शंकर बिऱ्हाडे, कारखान्याचे शेतकी अधिकारी शिवाजीराव देवकर, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, मुख्य रसायन तज्ज्ञ विवेक शुक्ला, अभियंता के. के. शाक्य, वर्क्स मॅनेजर भिसे, कामगार अधिकारी चिने, डुंबरे, ए. के. टेंबरे, कामगार सभेचे मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज आदींसह कारखान्याचे आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, संजीवनी उद्योग समुहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, भाजप पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बिपीनदादा कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी चौफेर टोलेबाजी करत आ. आशुतोष काळे यांच्या निष्क्रियतेचा पंचनामा करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी आमदार अशोकराव काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी गमवावे लागले असून, त्यांनी आता राजकारण करून जनतेला वेड्यात काढू नये. काळे पिता-पुत्रांच्या स्वार्थी राजकारणामुळे कोपरगाव मतदारसंघाचे पार वाटोळे झाले आहे. मतदारसंघासाठी तीन हजार कोटीचा निधी आणल्याचा गाजावाजा करणारे आ. आशुतोष काळे पाणीप्रश्न सोडविण्यात पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप करून शेतकऱ्यांप्रती खोटा कळवळा दाखविण्यापेक्षा त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे