आरोग्य व शिक्षण
विद्यार्थांसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाढीव बसेस सुरू करा -स्नेहलताताई कोल्हे यांची आगारप्रमुखांना सूचना
विद्यार्थांसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाढीव बसेस सुरू करा -स्नेहलताताई कोल्हे यांची आगारप्रमुखांना सूचना
–विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या स्नेहलताताई कोल्हे; पर्यायी बस पाठवत विद्यार्थ्यांची घरी जाण्याची केली व्यवस्था
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात अनेक गावांना एस. टी. बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. असाच प्रकार आज भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना निदर्शनास आला. कोपरगाव येथून चासनळी मार्गे जाणारी एस. टी. बस आज टाकळी फाटानजीक अचानक बंद पडल्याने असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी दुसरी बस येण्याची वाट पाहत होत्या. हे दृश्य माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी पाहताच त्यांनी सदर विद्यार्थ्यांना भेटून समस्या समजून घेतली आणि तात्काळ आगारप्रमुखांशी संपर्क साधून तातडीने दुसरी पर्यायी बस पाठवत या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली.



कोपरगाव आगारातून चासनळी मार्गे ग्रामीण भागात जाणारी एस. टी. बस आज टाकळी फाट्याजवळ अचानक बंद पडली. त्यामुळे या बसमधून जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी दुसरी बस कधी येणार याची वाट पाहत टाकळी फाट्याजवळ थांबल्या होत्या. हे दृश्य यावेळी तेथून जात असलेल्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना दिसले. त्यांनी सदर विद्यार्थ्यांना भेटून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि समस्या समजून घेतली. एस. टी. बस बंद पडल्याने आता आपल्या गावी घरी परत कसे जायचे, अशी चिंता या विद्यार्थ्यांना भेडसावत होती.
स्नेहलताताई कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन तात्काळ कोपरगाव येथील आगारप्रमुखांशी संपर्क साधला आणि तातडीने दुसऱ्या पर्यायी बसची व्यवस्था करण्यास सांगितले. कोल्हे यांच्या सूचनेवरून आगारप्रमुखांनी त्वरित दुसरी एस. टी. बस पाठवत या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली.


आज टाकळी फाटानजीक चासनळी मार्गे जाणारी एस. टी. बस अचानक बंद पडल्यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत त्यांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. यापुढे विद्यार्थ्यांची दैनंदिन होणारी गैरसोय टाळा व अधिकच्या नवीन बसेस मिळण्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करा. नवीन बसेस मंजूर होण्यासाठी मी सरकारदरबारी पाठपुरावा करते, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी आगारप्रमुखांना यावेळी सांगितले.

महाविद्यालयात सकाळी असणाऱ्या तासिकांना उपस्थित राहण्यासाठी आणि महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसते. बस असेल तरी विद्यार्थी असंख्य आणि बस मात्र एक अशी परिस्थिती अनेकदा दिसून येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने शासनाकडे पत्रव्यवहार करा. मी याबाबत सरकारदरबारी पाठपुरावा करून सरकारकडून हा प्रश्न सोडवून घेईन, अशी सूचना कोल्हे यांनी आगारप्रमुखांना केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, लवकरच हा प्रश्न सुटेल अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.




