कृषीवार्ता

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम – आ. आशुतोष काळे

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप करतांना आ. आशुतोष काळे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम – आ. आशुतोष काळे

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ६.५० कोटीच्या ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने शेती करणे काळाची गरज आहे. परंतु सर्वच शेतकरी कृषी औजारे खरेदी करू शकत नाही अशा गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर कृषी विभागाकडून कृषी औजारे देण्यात येतात. मात्र कृषी औजारांच्या शेतकऱ्यांच्या मागणी अर्जाची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत होती. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व कृषी औजारांचा लाभ मिळवून द्या अशा सूचना कृषी विभागाला केल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती देवून आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाचे कौतूक केले आहे.

कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस मजुरांची कमी होत असलेले संख्याबळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे कृषी यांत्रिकीकरणाला शेतकरी प्राधान्य देत असून आजची ती गरज झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळणे भाग पडले आहे. परंतु शेतमालाला खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे दैव देते आणि कर्म नेते अशी सातत्याने अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. वाढलेले कृषी औजारांचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही त्यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कृषी यांत्रिकीकरण योजना फायदेशीर आहे. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत आहे. हि तफावत दूर करून कृषी औजारे मिळण्यासाठी अर्ज केलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून सुमारे ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारे शेतकऱ्यांना मिळाली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.याप्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गोदावरी खोरे ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, नंदकुमार औताडे, प्रभाकर गुंजाळ, विठ्ठल जावळे,गणेश बारहाते, राजेंद्र औताडे, युवराज गांगवे, बाळासाहेब औताडे, भाऊसाहेब औताडे, बाजीराव होन, दत्तात्रय गांगवे, भारत रानोडे, नितीन पगार आदींसह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कृषी यांत्रिकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर लकी ड्रॉ द्वारे निवड होऊन शेतकऱ्यांना अनुदान वितरण केले जाते. सन २०२२-२३ या वर्षात कृषी विभागामार्फत सर्वाधिक कृषी यंत्र औजाराचे वाटप करण्यात आले. कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

– मनोज सोनवणे (तालुका कृषी अधिकारी)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे