धार्मिक
कलियुगात संकटे निवारणासाठी दैवी उपासना महत्वाची रमेशगिरी महाराज
संवत्सर बिरोबा चौक येथे राजेंद्र व धनंजय भाउसाहेब शिंदे यांनी स्थापन केलेल्या कुलस्वामीनी सप्तशृंगीमातेची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प. पू. रमेशगिरी महाराज, पोहेगांवच्या साध्वी शारदानंदगिरी महाराज यांच्या हस्ते बुधवारी करण्यांत आली.
कलियुगात संकटे निवारणासाठी दैवी उपासना महत्वाची रमेशगिरी महाराज
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव :- कुलदैवत, कुळाचार, कुळधर्म प्रत्येकाच्या घरात पाळला जातो त्यातुन मनुष्याच्या जीवनात उत्कर्षाच्या बीजाचे रोपण होते. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी प्रत्येक अक्षयतृतीयेला शिवपंचायतन याग करायचे, कलियुगात संकटे निवारणासाठी दैवी उपासना महत्वाची असल्याचे प्रतिपादन जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमाचे प्रमुख प. पू. रमेशगिरी महाराज यांनी केले. साडेतीन शक्तीपिठापैकी वणीची सप्तशृंगीमाता अर्धपीठ असून तिच्या पुजेने परिसरात नवचैतन्य निर्माण होते असेही ते म्हणाले. तालुक्यातील संवत्सर बिरोबा चौक येथील राजेंद्र व धनंजय भाऊसाहेब शिंदे यांनी कुलस्वामीनी सप्तशृंगीमातेची १ ते ३ मे दरम्यान प.पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, शिवाजीराव बारहाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पोहेगांव येथील साध्वी शारदानंदगिरी म्हणाल्या की, प्रत्येकाच्या उदरी जन्म घेतलेल्या मातीच्या गोळयाला घडविण्याचे काम माता पिता करत असतात, शिक्षक संस्काराची शिकवण देतात. कारागिर मुर्तीला घडवितो पण त्यात प्राण ओतण्याचे काम ईश्वरीय शक्ती करत असते, तेंव्हा पंचक्रोशीत ज्या ज्या ठिकाणी नव नविन मंदिरे साकारली जातात, जुन्या मुर्तीचा जीर्णोध्दार होतो त्या त्या ठिकाणी नागरीकांनी आमंत्रण नसले तरी दर्शनाला गेलेच पाहिजे. जगात निर्माण होणाऱ्या संकटावर विजय मिळवण्याचे काम आदिशक्ती देवीनेच केले असल्याचे त्या म्हणाल्या.प. पू. रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, कोपरगांवची भूमि ऐतिहासिक आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून येथे देव-देवतांबरोबरच संत, महंत ऋषीमुनींच्या अध्यात्मीक कार्याचा वास आहे. संवत्सर या नगरीला साक्षात इंद्र देवतेचे वरदान लाभलेले आहे, नारदाची नारदी येथे झाली, भगवान श्रीरामाचा कृपाप्रसाद संवत्सरच्या शृंगऋषींच्या माध्यमातून मिळाल्याची आख्यायिका आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमाला महत्व देत कोपरगांव बेट भागात अध्यात्माबरोबरच संस्काराचे व्यासपिठ निर्माण केले आहे. गणपती, देवी, भगवान विष्णु, भगवान शिव आणि सुर्यनारायण या पाच शिवपंचायतन दैवी शक्ती असुन त्याचा याग ते प्रत्येक वर्षी करत त्यातुन वंचित उपेक्षीत घटकांची असंख्य संकटे निवारण होवुन भक्तीमार्गाची दिशा मिळाली. भगवान शंकर बिरोबानगरीत सप्तशृंगी मातेचा वास शिंदे कुटुंबियांनी मंदिराच्या माध्यमातुन उभा केला असुन त्याच्या नित्यपुजेने सर्वांच्या जीवनांत आनंद निर्माण होईल असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमुर्ती, ज्योतिष भास्कर गुरूवर्य गणेश महाराज लोहणेरकर गुरूजी यांनी केले. प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी संवत्सर पंचक्रोशीतील असंख्य भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी राजेंद्र भाउसाहेब शिंदे यांनी आभार मानले.



