महंत रमेशगिरी महाराजांचे गोदावरीत पंचकर्म पौर्णिमेनिमित्त अभ्यंगस्नान
महंत रमेशगिरी महाराजांचे गोदावरीत पंचकर्म पौर्णिमेनिमित्त अभ्यंगस्नान
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव :-नारळी पौर्णिमा व श्रावण पंचकर्म पौर्णिमेचे औचित्य साधून संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख महंत रमेशगिरीजी महाराज यांनी संवत्सर येथे गोदावरी नदीमध्ये अभ्यंगस्नानाची पर्वणी साधून गोदावरीची साडी चोळीने ओटी भरून पूजन केले असंख्य भावीक यावेळी उपस्थित होतेमहाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनी महंत रमेशगिरीजी महाराज यांना दूध, दही, तूप, मध व गोमुत्राने अभ्यंस्नान घालून पूजन केले. संवत्सर हे गांव दंडकारण्याचाच एक भाग असून या परिसरात रामायणकालीन अनेक प्रसंग घडलेले आहेत. राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञासाठी ज्या शृंगऋषीना पाचारण केलेल होते त्यांचे मंदीर संवत्सर येथे गोदावरी काठावर आहे. त्यामुळे संवत्सरला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी पात्रात स्नान करण्यासाठी संवत्सरला महिला भाविकांची प्रचंड गर्दी होते. संपूर्ण नदीपात्र जनसागराने व्यापून जाते. नारळी पौर्णिमा आणि श्रावण पंचकर्म पौर्णिमेलाही दरवर्षी असंख्य भावीक गोदावरीत स्नानाची पर्वणी साधून घेतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही महंत रमेशगिरीजी महाराज यांनी संवत्सर येथे येऊन भावीक भक्तांसह अभ्यंगस्नान केले. गोदावरी नदीची महती व भगिरथाने तिला धरतीवर आणण्यासाठी केलेले प्रयास याविषयी महंत रमेशगिरीजी महाराज यांनी आपल्या भाषणातून भाविकांना मार्गदर्शन केले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेली गोदावरी लोकांच्या मनाचे श्रध्दास्थान बनलेली आहे. श्रावणात गोदावरी नदीत स्नान केल्याने पापक्षालन होते. मानवी जीवनात चैतन्य येते असे सांगून मानवी जीवनाचे सार्थक करायचे असेल तर प्रत्येकाने गोदावरीच्या स्नानाचे औचित्य साधून घेण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले


कार्यक्रमासाठी लक्ष्मणराव परजणे, कोपरगाव बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे, बाळासाहेब दहे, सोमनाथ निरगुडे, ज्ञानदेव गायकवाड, शिवाजीराव गायकवाड, काका गायकवाड, सुभाष गिते, बापू तिरमखे, बाळासाहेब भोसले यांच्यासह गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


