कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा !!- सोसायटीचे उपाध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांची मागणी
कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा !!- सोसायटीचे उपाध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांची मागणी
जेऊर कुंभारी वार्ताहर:-पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाची पिके सोयाबीन, मका, कपाशी ही पिके घेतली आहेत मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही पावसाने ओढ दिल्याने पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे शासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जेऊर कुंभारी वि.का.स.सेवा संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे.कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी चाऱ्यांना अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. हरिसन ब्रँच चारीने जेऊरकुंभारी, कोकमठाण, चांदेकसारे, डाऊच खुर्द, पानमळा या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळत असते.मात्र उजवा कालवा सोडून एक महिना उलटून गेला मात्र अद्यापही हरिसन ब्रँच चारी कोरडी आहे. चारी वेळेवर न सुटल्यामुळे विहीरीनी तळ गाठला आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पुर्वी हरिसन ब्रँच चारीच्या लाभार्थी गावांना कॅलिफोर्निया म्हणून संबोधले जात होते. हा भाग सुजलाम सुफलाम होता मात्र आता ही चारी व तिचे लाभक्षेत्र कोरडेठाक पडले आहे. कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी जाणिव पुर्वक हरिसन ब्रँच चारीला पाणी सोडू देत नाही का असा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे. पाटपाण्यासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर फॉर्म भरून देखील पाणी मिळत नाही. हरिसन ब्रँच लाभार्थी शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागत आहे. चारी वेळेवर न सुटल्यामुळे विहीरींनी तळ गाठून कोरड्या पडू लागल्या आहेत. पाच सहा दिवसात चारीला पाणी सुटले नाही तर गावोगावी पाण्याचे टँकर फिरवण्याची वेळ येणार आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच पाटबंधारे कार्यालयावर जाऊन संघर्ष करावा लागत आहे ही खेदाची बाब आहे. कोपरगाव तालुक्यातील आजी माजी आमदारांनी याकडे लक्ष देऊन हरिसन ब्रँच चारीला पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावा असे भावनिक आवाहन दादासाहेब चव्हाण यांनी केले आहे.




