२०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्याला २.७१ कोटी – ना. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :- मागील वर्षी २०२१ मध्ये ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी होवून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घेऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून झालेल्या नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव तालुक्याला २.७१ कोटी नुकसान भरपाई मंजूर केली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मागील वर्षीच्या पावसाळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होवून शेती पिकांसह सार्वजनिक मालमत्तांचे देखील मोठे नुकसान झाले होते. कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नव्हता. कोपरगाव तालुक्यात देखील जोरदार अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या नुकसानीचे पंचनामे करावे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व नुकसानीचे पंचनामे होतील याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यावेळी ना. आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ना. आशुतोष काळे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार तसेच कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव तालुक्यासाठी २ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती नामदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून दरवर्षी अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थिती निर्माण होवून शेतीचे नुकसान होत आहे. परंतु संकटकाळी शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून झालेल्या नुकसानीची भरपाई देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्य सरकार वेळेवर देत असल्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी आहे. अतिवृष्टींच्या नुकसानीपोटी मतदार संघातील शेतकरी व नागरिकांना या पूर्वी ३ कोटी ९ लाखाचे अनुदान वाटप केले असून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा २ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई दिल्यामुळे मतदार संघातील जनतेच्या वतीने नामदार आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.
