महाराष्ट्र
कोल्हेंच्या सामाजिक कार्याचा वारसा तिस-या पिढीत-कैलास ठोळे
साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची निवड झाल्याबददल त्यांचा कोपरगांव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यांत आला
कोल्हेंच्या सामाजिक कार्याचा वारसा तिस-या पिढीत-कैलास ठोळे
कोपरगांव – संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशाच्या व राज्याच्या उत्कर्षात मोलाचे योगदान देत साखर उद्योगातुन परिसराचा कायापालट केला, तोच सामाजिक कार्याचा वारसा तिस-या पिढीत आला असून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे तो समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कोपरगांव पिपल्स बँकेचे आर्थिक आधारस्तंभ, उद्योगपती कैलास ठोळे यांनी केले.कोपरगांव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीच्यावतीने साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची निवड झाल्याबददल त्यांचा बुधवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, कार्याध्यक्ष विजय बंब व सचिव उत्तमभाई शहा यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघात कोल्हेंनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली. श्री. कैलास ठोळे पुढे म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रात खुली स्पर्धा आहे. भारत देशाने कोरोना आपत्तीच्या काळात जगात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. बँकींग क्षेत्रात होणा-या स्थित्यंतराचा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अचुकपणे अभ्यास करीत त्यातील संधी शोधुन त्यानुरूप ग्रामिण अर्थकारणाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांच्यानंतर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांव शहर व मतदार संघाच्या प्रत्येक समस्येची दखल घेवुन त्यावर काम केले. आता त्यांची तिसरी पिढी विवेकभैय्या कोल्हे यांच्या रूपाने सामाजिक कार्यात उतरली आहे. ते कर्तृत्ववान आणि हुशार आहेत. मनुष्याकडे विकासाचा दृष्टीकोन आणि अचुक निर्णय घेण्यांची क्षमता असली की सामाजिक कार्यात त्याला सातत्याने यश मिळते. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी झालेली निवड सार्थ ठरो असेही ते म्हणाले. याप्रसंगी सर्वश्री. विजयराव ससाणे, डॉ विलास आचारी, डॉ. इंद्रवदन दोडीया, सुवालाल भंडारी, रजनीताई गुजराथी, साई संजीवनी बँकेचे संचालक रेवजी रूंजाजी आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर सभारंजक, साई संजीवनी सहकारी बँकेचा सर्व सेवकवर्ग आदि उपस्थित होते. शेवटी सचिव उत्तमभाई शहा यांनी आभार मानले.




